संवेदनशिल असणे चांगली गोष्ट आहे. परंतु अतिसंवेदनशिल असणे हे मनाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. स्त्रिया या सर्वसाधारणपणे पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशिल असतात, असे आपल्याकडे मानण्यात येते. त्या संवेदनशिलच असतात की अतिसंवेदनशिल असतात हयाचा विचार ज्याने त्याने वेगवेगळा करावा.
त्याचे असे झाले की मी दूरदर्शनसंचावर कार्यक्रम पाहत बसलो होतो. अचानकपणे एक नंबर्ड कॉल आला. माझ्या सवयीप्रमाणे मी नंबर्ड कॉल घेत नाही. परंतु तो थोडा थोडा वेळ थांबून तिनदा आला. नक्कीच कोणाचे काहीतरी काम असावे असा विचार करुन मी फोन घेतला. पलिकडचा आवाज स्त्रीचा होता परंतु ओळखीचा वाटत नव्हता. पलिकडच्या स्त्रीने तिचे नांव आडनांव ही सांगीतले पण माझी टयुब काही पेटेना. शेवटी तिने मी संचालनालयात असतांना मला २-३ वेळा भेटल्याचे सांगीतले व माझी टयुब पेटली. सदर स्त्री ही एक NGO चालवत होती व आहे. ती संस्था NEET परिक्षा देवून निकालाची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करते.
आजच्या अत्यंत चुरशीच्या दिवसात मेडिकल कॉलेज मधे प्रवेश मिळणे हे केवळ तुमच्या SML नंबर वर अवलंबून नाही, तर तुमची Category, तुम्ही दिलेले Choices, हया अनेक बाबींवर अवलंबून असते. त्यासाठी मागच्या वर्षी कितीवर ॲडमिशन क्लोज झाली होती, त्या विशिष्ट संस्थेत कितीवर क्लोज झाली होती, यावर्षीचा स्कोअर कसा असणार आहे याचे ठोकताळे बांधावे लागतात व ते अनेकांना समजतातच असे नाही व त्यामुळे काहीवेळा चुकीचे Choices दिल्यामुळे ॲडमिशन मिळत नाही किंवा न आवडणा-या कॉलेजमधे मिळते. हा सर्व प्रकार हा बुध्दीबळाच्या खेळाप्रमाणे असतो. या बाबत सेवानिवृत्त संचालक डॉ. शिनगारे यांचा प्रदिर्ध अनुभव व त्यांची या विषयातील आवड लक्षात घेता अनेक अशा संस्था डॉ. शिनगारे यांना पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवायच्या. ते अतिशय आनंदाने राज्यात अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांना जात व पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असत. डॉ. शिनगारे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदावर येणा-या कोणालाही या विषयात एवढा अनुभव व आवड नव्हती. ही बाब लक्षात न आल्यामुळे बहुतेक संस्थांचे कार्यक्रम पुर्वीप्रमाणेच सुरु राहले.
अशाच एका कार्यक्रमासाठी सदर स्त्रीने विद्यमान संचालकांना एका कार्यक्रमास हजर राहण्याची विनंती केली व ती त्यांनी मान्य केली. कार्यक्रम ठरला. परंतु वेळेवर संचालक काही अपरिहार्य कांरणांमुळे हजर राहू शकले नाहीत व ठरलेल्या कार्यक्रमाची अडचण झाली. हयामुळे सदर आयोजीका एवढी Disturb झाली की तिने आकांड तांडव केले, रडून रडून डोळे सुजवले व हया विमनस्क अवस्थेतच मला फोन केला. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की संचालकाला अचानक मंत्री बोलवू शकतात, सचिव बोलवू शकतात वा इतर काही कामामुळे येणे शक्य होत नाही. तसेच ते नवीन आहेत, त्यांना admission process चा एवढा अनुभव नसावा, हे ही एक कांरण असू शकते. तसेच आता admission cell हा संचालकाच्या अखत्यारीत येत नाही. वगैरे. परंतु त्या बाईचे रडणे काही थांबेना. माझा नवरा काही महिन्यापुर्वी मेला, तो असता तर त्याने माझी सांत्वना केली असती, माझे वडिल काही वर्षांपुर्वी वारले, तुम्ही मला माझ्या वडिलांप्रमाणे आहात. वगैरे. व “माझ्या मनांत निर्माण झालेली ही मळमळ मळमळ” मला कुठेतरी ओकायची होती, तेंव्हा मला दुसरे कोणीही दिसले नाही की ज्याच्यावर मी विश्वास ठेउन रडू शकते. क्षणभर मला धक्काच बसला. मळमळ झाली म्हणून तर ही बाई वॉशबेसीन ( मी ) कडे आली नाही, असेही वाटले. क्षणार्धात दुसरा विचार आला. तसे का असेना, त्या बाईला आपले दु:ख्ख हलके करण्यासाठी माझा वॉश बेसीन सारखा उपयोग करावासा वाटला व तेवढा तिला विश्वास वाटला हे ही नसे थोडके.
फोन संपल्यानंतर शांतपणे डोळे मिटून विचार करत बसलो. खरच कोणाचे तरी वॉश बेसीन होण्यात काय अडचण आहे? मनामधे विचारांचा कल्लोळ दाटला असतांना जर कुणी आपल्याकडे त्याचे मन हलके करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून तुमची निवड करीत असेल तर ती तुमचा पोत उंचावणारीच बाब आहे, असे समजण्यास हरकत नाही.
Leave a Reply